मोडी लिपी काय आहे?
मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडीतली अक्षरे चक्रकार (circular) असतात, त्यामध्ये मराठीच्या विपरीत काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरूवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपित चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून ऐतिहासिक संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.
मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी (ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही.
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. मोडी हा शब्द फारसी भाषेतील ‘शिकस्ता’ यावरून आलेला आहे. गेल्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रातील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, अत्यंत शुध्दलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवकाळ ते उत्तर पेशवाई ह्या काळातील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे, बदल लक्षात येतात. मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती,याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते.लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही.इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात.देवनागरी अक्षरे।अक्षरआडव्या ,उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्या मुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरुन वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. उद्गारवाचक चिन्हांचा वापर इंग्रजीशी ओळख झाल्या नंतरच भारतीय भाषात सुरू झाला.
१]हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु,
वोळी लेहे वेगवंतु,आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)
२]सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)
३]दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)
४]आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)
इ.स.१८०१मध्ये विल्यम कॅरे या सदगृहस्थाने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ,सेरामपुर बंगालयेथे बनवला.
“रघु भोसल्यांची वंशावळी “,” मराठी भाषा व्याकरण”,”मराठी कोष”, “नवा करार “(१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाइ केली गेली.
ख्रिश्चन मिशनरीनी मराठी बायबल मोडी लिपीत छापले.
ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे – यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखानात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तिच, शिवकालीन शैली किंचीत उजवीकडे वाकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधीक वर्तुळाकार आणि सुटसूटीत अक्षरे लिहीण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांजकडून सुरु झाला. इथ पर्यंत मोडी लिपी ही टाक ने लिहीली जात. याच प्रयत्नांना पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत ती अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसूटीत लिहीली गेली. पेशवेकाळात लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटी फाऊंटन पेनाचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत ती या फाऊंटन पेनाच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागूंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनाचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून रहात. म्हणून साध्याचे मोडी लिखक फाऊंटन पेनाच्या कॅलग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
अलिकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून मोडी लिपी ही शिकस्ता मधून निर्माण झाली या मताचे खंडण करते. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्ता मधून आली नव्हती. तसेच, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. परंतु, नागरी, गुर्जर आणि बांग्ला लिप्यांशी मोडी साधारम्य आहे.
Source : http://mr.wikipedia.org/wiki/मोडी